हे असं अवखळपण , चंचलपण .. कधी पानं , फुलं , तारे , कधी स्वप्नं वेचताना , हसून बघत होतास .. उतरणीवर कधी घसरले , तेव्हांही , गालात हसून , बोट दिलेस धरायला .. दुस्तर वाटेवर कधी कचरले तर , डोळ्यांनी धीर दिलास .. पाठीवर हात ठेवून , झुंजायला बळ दिलेस .. हात सुटले हातातून , पण साथ नाही सरली , तू आहेसच खास , मागेपुढे , आसपास .. दिसला नाहीस कधी , पण जाणवतो तुझा वास .. आता जीर्ण झालीय श्वासांची माळ , जेव्हां ओघळेल तेव्हां , असशील ना आसपास ... ?
मावळतीला जाताना सूर्याने प्रश्न केला, "माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्तब्ध उभे राहिले.. तेव्हां एक चिटुकली पणती चटकन् पुढे होऊन म्हणाली, "प्रभो,माझ्याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर
Comments