Posts

Showing posts from August, 2018

सख्या ...

तूच उगीच दुखवलंस , डोळ्यांत अश्रु उभे राहिले .. अश्रूंच्या आडून तुझं हंसू चमकलं , डोळ्यांत स्वप्नांचं इंद्रधनू  उमटलं .. चिडव , रडव किती  ते , रडणारच नाही ..ठरवून .. इंद्रधनूतली स्वप्नं , जातील  ना  ओघळून ....

सख्या ...

तू सांग , नाही तर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या -माझ्यातलं, विरूनसं गेलंय कांही ... आठवतंय ना पाणंदीवर ? गवताच्या पात्यांवर , चमकणारं ते  दहिवर.. त्यांच्या चिमुकल्या आकाशात, सारं विश्व थरथरत राही .. त्यांत भिजत पावलं , तुझीही , माझीही .. तुझ्या ओल्या पावलांचा , आज माग सापडत नाही .. ते तुझ्या -माझ्यातलं , विरूनसं गेलंय काही .... किती  गूज करत , बसलो त्या कातळावर .. दाखवलं होतंस मला , ते रानफूल  लाजणारं.. खुडलं नाहीस  तूही , नाही खुडलं मीही .. कुठे दूर वाऱ्याबरोबर , उडून गेलं का तेही ? गंध मात्र माझ्याभोवती , अजून दरवळत राही ... तू सांग,  नाहीतर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या माझ्यातलं , विरूनसं गेलंय कांही .......

सख्या ....

माझी वाट खाचा -खळग्यांची , तुझी  वाट  नागमोडी , अचानक भेटीची एक घडी .. अजुनी नुसताच धरलाय हात , नाही बोटांची गुंतागुंत , सोडून देऊ उशीर होण्याच्या आत .. नको वाटांची सांधेजोड , नको भावनांची पडझड , नको मनांची घडमोड .. नकोच ती तडातड , तू धर ऐलथड , मी धरते पैलथड .....